मुंबई – वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना चाप बसवा यासाठी पुढील आठवड्यापासून नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हेल्मेट किंवा सीटबेल्ट नसेल, तर तुम्हाला एक हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. वाहतुकीच्या संदर्भातील हे नवे नियम पुढील आठवड्यापासून लागू होणार असल्याचं बोललं जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटर वाहन अधिनियम कायदा २०१९ अंतर्गत सोमवारपासून कारवाई करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
नव्या नियमांनुसार, मध्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांवर, न्यायालयीन कारवाईनंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नवीन कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी ६ महिनेतुरुंगवास आणि / किंवा १० हजार रुपये दंड ठोठावला जाण्याची तरतूद आहे, तर दुसऱ्यांदा अशाच प्रकारचा गुन्हा केल्यास २ वर्षेतुरुंगवास आणि / किंवा १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलेकी, आम्ही काही नियमांच्या दंडात कपात करण्याचा निर्णय घेणार आहोत. फॅन्सी नंबर प्लेट असल्यास वाहनचालकांनाही १ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आकारण्यात येणाऱ्या सुधारित दंडाची अंमलबजावणीचा निर्णय वाहनचाकांना शिस्त लागावी तसेच अपघात कमी करण्यासाठी लागू करण्यात येणार आहे. फॅन्सी नंबर प्लेटसाठी, रिफ्लेक्टर, टेल लॅम्प नसल्यास, हेल्मेट नसल्यास तसेच सीटबेल्ट नसल्यास वाहन चालकांना १ हजार रुपये दंड तर वेगाने बाईक चालविल्यास, परमिटशिवाय वाहन चालविल्यास २ हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो.