काही शहरांमध्ये तणाव; अमरावतीतील रॅलीला हिंसक वळण
अमरावती/मालेगाव/नांदेड/भिवंडी – त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या आणि एका रॅलीत पैगंबरांबद्दल अपशब्द वापरल्याच्या कथित घटनेचे शुक्रवारी महाराष्ट्रात पडसाद उमटले. त्यामुळे अमरावती, मालेगाव, भिवंडी आणि नांदेडमध्ये प्रचंड मोर्चे काढण्यात आले. अमरावतीत या घटनेचे हिंसक पडसाद उमटल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. त्रिपुरातील एका रॅलीत पैगंबरांबद्दल अपशब्द वापरण्यात आल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्यानंतर मुस्लीम समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला. अमरावतीत मुस्लीम कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून या घटनेचा जोरदार निषेध नोंदवला. बघता बघता हजारो मुस्लीम बांधव एकत्र गोळा झाले आणि त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना वाटेतील दुकाने जबरदस्तीने बंद करण्यात आली. दुकानदारांनी दुकाने बंद करण्यास नकार दिल्याने त्यांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि वातावरण तणावपूर्ण बनले. कथित घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावतीमध्ये मुस्लीम बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवली. या कथित घटनेचा निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या १५ ते २० हजार लोकांच्या या मोर्चाला हिंसक वळण लागले. यावेळी मोर्चाकरांनी जयस्तंभ चौकातील व शहरातील विविध भागांतील २० ते २२ दुकानांची प्रचंड तोडफोड केली तसेच एका दुचाकीचीही तोडफोड केली.
मोर्चादरम्यान मोर्चेकऱ्यांनी भाजप व आरएसएसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यादरम्यान पोलीस व आंदोलक आमने-सामनेदेखील आले. यावेळी झालेल्या दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यामुळे या मोर्चाला गालबोट लागले. मुस्लीम बांधवांच्या मोर्चाला हिंसक वळण लागल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावावर नियंत्रण मिळवले. काही प्रमाणात आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली, मात्र ज्येष्ठ मुस्लीम कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करीत आंदोलनावर नियंत्रण मिळवले. त्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यलायवर धडकला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.या घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्येही बंद पुकारण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुकानदार आणि मुस्लीम तरुणांमध्ये बाचाबाची झाली. काही ठिकाणी तोडफोड आणि दगडफेक झाली. त्यामुळे पोलिसांनी जमावावर लाठीमार केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. भिवंडीतही या घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पुकारण्यात आला. बंदमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था ठप्प होती, तसेच बाजारपेठा आणि दुकानेही बंद होती. भिवंडीतील या बंदमध्ये समाजवादी पार्टी, एमआयएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादीही उतरल्याने बंद शंभर टक्के यशस्वी झाला. मालेगावमध्येही या घटनेचे पडसाद उमटले. मालेगावातील मुस्लीम समुदायाने बंद पुकारला. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यता आला होता.
तोडफोड, हिंसा चिंताजनक – फडणवीस
त्रिपुरातील घटनेचे राज्यभरात पडसाद उमटल्याने त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत. राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …