ठळक बातम्या

 मालेगाव दंगलीआधी एक दिवस आरोपींनी मागवल्या ३० तलवारी

पोलीसही चक्रावले
नाशिक – मालेगावमधून जप्त केलेल्या ३० तलवारींचे मालेगाव दंगल कनेक्शन उघड झाल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. दंगलीच्या एक दिवस आधी ११ नोव्हेंबर रोजी या तलवारी शहरात आणण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्यामागे दंगलीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वसीम अहमद लईक अहमद याचा हात असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यानेच या तलवारी मागवल्या होत्या. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी वसीमला या गुन्ह्यात वर्ग केले आहे. सोबतच दुसरा संशयित वसीम अहमद निहाल याला बेड्या ठोकल्या आहेत. या तलवारी राजस्थानमधील अजमेर आणि पुष्करमधून खरेदी केल्या गेल्या आहेत. आता तलवारीचा नेमका काय वापर करण्यात येणार होता? याचा शोध पोलीस घेत आहेत.
मालेगावमधील नवापुरा भागातील वरळी रोड परिसरात अप्पर पोलीस अधीक्षकांनी एका घरावर छापा टाकला. तेव्हा त्यांना एक पोते भरून तलवारी मिळाल्या. मोहम्मद बिलाल याच्या घरी या तलवारी ठेवण्यात आल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद बिलालसह महेमुद अब्दुल रशीद आणि आणखी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. एकूण २० हजार रुपये किमतीच्या या ३० तलवारी आहेत. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश घुसर, हवालदार शेखर ठाकूर, पंकज डोंगरे, विशाल गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत, रामेश्वर घुगे, हवालदार वसंत महाले, भूषण खैरनार, संदीप राठोड आदींच्या पथकाने ही कारवाई केली होती.
त्रिपुरा येथील कथित घटनेच्या पार्श्वभूमीवर मोर्चा काढून मालेगावमध्ये असंतोष निर्माण करून दंगल पेटवण्यात आली. त्यामुळे राज्यात अमरावती आणि नांदेडही पेटले. या हिंसाचारात मालेगावमध्ये अनेक दुकानांची राखरांगोळी करण्यात आली. लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. नगरसेवक अयाज हलचलने एक आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली. ती क्लिप इतर चौघांच्या मदतीने वेगवेगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड केली गेली. एकंदर मालेगावमध्ये झालेला हिंसाचार हा सुनियोजित होता, असे पुढे आले. आता या तलवारी दंगलीच्या अगोदर एक दिवस कशासाठी शहरात आणल्या होत्या? याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …