निकाल १४ डिसेंबरला
मुंबई – भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या सहा जागांसाठी (स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ) निवडणूक जाहीर केली आहे. येत्या १० डिसेंबर रोजी या सहा विधान परिषद जागांसाठी मतदान घेतले जाणार आहे. मतमोजणी १४ डिसेंबरला होणार असून, निकालही त्याच दिवशी घोषित केले जाणार आहेत. या सहा जागांमध्ये मुंबई, कोल्हापूर, धुळे-नंदुरबार, अकोला, नागपूर यांचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुरळा पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीमध्ये राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी एकत्र लढणार की, सर्व पक्ष वेगवेगळे लढणार याबाबत उत्सुकता आहे. यापूर्वी काँग्रेसने अनेकवेळा स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे काँग्रेस स्वबळावर मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे प्रत्येक पक्ष आपापले बळ दाखवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आगामी निवडणूक मोठी चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
रामदास कदम (शिवसेना, मुंबई), भाई जगताप (काँग्रेस, मुंबई), सतेज पाटील (काँग्रेस, कोल्हापूर), अमरिश पटेल (भाजप, धुळे-नंदुरबार), गिरिश व्यास (भाजप, नागपूर), गोपीकिशन बाजोरिया (शिवसेना अकोला-बुलढाणा-वाशिम) यांचा कार्यकाल संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक घेतली जात आहे. प्रशांत परिचारक (भाजप, सोलापूर), अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस, अहमदनगर) यांच्या जागांसाठी अद्याप निवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही. भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीसाठी १६ नोव्हेंबरला अधिसूचना जाहीर केली जाणार असून, अर्ज दाखल करण्याची तारीख १३ नोव्हेंबर आहे. २४ नोव्हेंबरला अर्जांची छाननी केली जाणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत २६ नोव्हेंबर आहे. आवश्यकता भासल्यास (निवडणूक बिनविरोध न झाल्यास) १० डिसेंबरला सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान घेतले जाईल. मतमोजणी आणि निकालाची प्रक्रिया १४ डिसेंबरला पार पडणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले.