ठळक बातम्या

मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा – चंद्रकांत पाटलांची मागणी

कोल्हापूर – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विविध मुद्यांवरून राज्य सरकारवर टीका केली आहे. पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करणे, उद्धव ठाकरे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणे, नवाब मलिक यांच्यावर एनआयए कारवाईची मागणी आदी मुद्यांवर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. चंद्रकात पाटील यांनी नवाब मलिक यांना राज्यातील कोणत्याही गावात फिरू देणार नाही, असे म्हटले आहे. एनआयएने नवाब मलिक यांना तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे. नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.
पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यानंतर महागाईिवरोधात काँग्रेस नेत्यांकडून आंदोलन करण्यात आले होते. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे ५ आणि १० रुपयांनी कमी केले आहे. त्यानंतर ११ भाजपशासित राज्यांनीदेखील कर कमी केले आहेत. फक्त भाजपशासित राज्यांनीच नाही, तर काँग्रेसशासित राज्यांनी देखील इंधनावरील कर कमी केले आहेत; मात्र ठाकरे सरकारने कर कमी करण्याचा निर्णय घेतला नाही, असे पाटील म्हणाले.
उद्धव ठाकरे यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालय का चालत नाही?, असा सवाल पाटील यांनी केला आहे. मुख्यमंत्री सरकारी रुग्णालयात उपचार घेत नाहीत याचा अर्थ राज्यातील सरकारी रुग्णालये सुस्थितीत नाहीत हे सिद्ध होते, असे ते म्हणाले. मला वैयक्तिक टीका करायची नाही. पण, देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाल्यानंतर ते सरकारी रुग्णालयात दाखल झाले होते, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक खान यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या कायदेशीर नोटिशीबद्दल विचारले असता, आम्ही चळवळीतील कार्यकर्ते आहोत, आम्ही कोणत्याही कारवाईला घाबरत नाही, असे पाटील म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …