वसई (पालघर) – ईडी (अंमलबजावणी संचालनालय), आयटी (आयकर विभाग) या यंत्रणांनी देशातील दोन नंबरचे व्यवहार करणारे, काळाबाजार करणारे, ज्याच्यांकडे अवैध संपती आहे, अशा लोकांच्या मागे लागून केंद्र सरकारचे उत्पन्न वाढवले पाहिजे, मात्र या संस्था अशा लोकांना मोकाट सोडून, राजकारण्यांची १० ते १५ वर्षांपूर्वीची प्रकरणे बाहेर काढून त्यावर बोट ठेवण्याचे काम करीत असल्याचा गंभीर आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी येथे केला. वसईत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे’वेळी त्यांनी हा आरोप केला. विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जलसंपदा मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा संपूर्ण दिवसभरासाठी वसई विरार आणि पालघर दौरा होता. या दौऱ्यात नालासोपारा आणि वसई विधानसभेतील कार्यकर्त्यांची आढावा बैठकही घेतली गेली. यावेळी पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी ईडी आणि आयटी यांच्यावर आरोप करीत केंद्र सरकारवर निशाणा साधला. महाविकास आघाडीला नामोहरम करण्यासाठी, सरकार पडत नाही म्हटल्यावर बदनाम करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब भाजप करीत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.
यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी सरकार स्थिर आहे. भाजपचे कार्यकर्ते सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षात प्रवेश करीत आहेत. तिन्ही पक्ष बळकट होणार आहेत. त्यामुळेच भाजप टोकाचे प्रयत्न आणि आरोप करीत असल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीत एकत्र लढण्यावर राष्ट्रवादीचा भर असेल, असे संकेतही पाटील यांनी यावेळी दिले. यावेळी पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी पोलीस अधिकाऱ्याविषयी गंभीर आरोप केले आहेत. विरोधी पक्षात असताना शेखर बागडे या पोलीस अधिकाऱ्याची वागणूक अत्यंत उद्धटपणाची होती. कुणीही लोकप्रतिनीधीची कॉलर पकडून त्याचा अपमान करतो. आर्थिक गुन्हे शाखेला बदली झाल्यावरही बागडेंनी बिल्डरांना कार्यालयात बोलावून हप्ते घेतल्याचा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी बद्दल आदर नसेल, तर असा अधिकारी व्यवस्थेचा भाग होऊ शकत नाही. त्याला बाजूला बसवण्याची मागणी पोलीस महानिरीक्षकांकडे केल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …