
राज्य परिवहन मंडळाचे (एस.टी) राज्य शासनाच्या व्यवस्थेमध्ये विलीनीकरण करण्यासाठी एस.टी.कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. अशावेळी शहरातील नोकरदार वर्गाला नाईलाजाने खाजगी वाहतूक अथवा सार्वजनिक प्रवासी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.या प्रवासी वाहन चालकांनी प्रवाशांना वेठीस धरून अवाच्यासव्वा भाडे वसूल करीत आहेत. या बाबत ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी व स्थानिक वाहतूक पोलीस रिक्षाचालक आणि इतर खाजगी वाहनांवर कोणतीही कारवाई करीत नाही. वास्तविक अशा लांब पल्ल्याच्या ठिकाणी सुरु असलेल्या प्रवासी वाहतुकीसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियमावली आणि वाहतूक भाडे निश्चित करण्याची गरज आहे. ज्यादा भाडे घेणाऱ्या रिक्षा व टॅक्सी विरोधात भिवंडी,कल्याण आणि ठाणे वाहतूक विभागाकडे अनेकदा प्रवाशांनी तक्रारी केल्या आहेत पण पोलिसांनीही धृतराष्ट्राची भूमिका घेत दुर्लक्ष केले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाल्यानंतर शासनाने सर्व सुविधा खुल्या केल्या असताना नागरिकांना प्रवासी वाहन चालकांच्या मोजोरगिरीचा सामना करावा लागत आहे. कल्याण भिवंडी रिक्षा प्रवास ६० रुपये ते १०० रुपये झाला आहे. तर ठाणे भिवंडी प्रवास १०० ते १५० रुपये झाला आहे. या सर्व आर्थिक लूट करणाऱ्यांवर कोणी अंकुश आणणार आहे कि नाही ? असा आक्रोश सध्या प्रवासी नोकरदार व विद्यार्थी वर्गातून होत आहे.