मुंबई – शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावरील मंगळवारच्या सुनावणीला स्थगिती देण्यात आली. बुधवारी म्हणजेच २७ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा या जामीन अर्जावर युक्तिवाद होईल. मंगळवारी दिवसभरात फक्त आर्यन खानचे वकील मुकूल रोहतगी यांनी बाजू मांडली. बुधवारी दुसऱ्या बाजूने युक्तिवाद होणार आहे. क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असेलल्या आर्यन खानने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी आर्यन खानची बाजू ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी मांडली. न्यायालयाने रोहतगी तसेच एनसीबीच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली. नंतर सुनावणी स्थगित करण्यात आली. बुधवारी पुन्हा एकदा आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी घेतली जाणार आहे. त्यामुळे न्यायालयात नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
न्यायालयाने मंगळवारची सुनावणी थांबवल्यानंतर नेमके काय घडले? याची माहिती वकिलांनी दिली. एका बाजूने युक्तिवाद झाला आहे. बुधवारी दुसऱ्या बाजूने युक्तिवाद होणार आहे. युक्तिवाद सुरू असल्याने न्यायाधीशांनी काहीही सांगितले नाही. बुधवारी दुपारी तीन वाजता पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे, असे वकिलांनी सांगितले. आर्यनच्या बाजूने मुकूल रोहतगी यांनी तब्बल दोन तास युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी आर्यन खान कसा निर्दोष आहे? हे न्यायालयासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. कू्रझवर जाण्यापूर्वीच आर्यन खानला अटक करण्यात आली. अटक करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली नव्हती, असे रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले. आर्यन खानचा संबंध फारतर अरबाज मर्चंट तसेच अचित कुमार यांच्याशी जोडला जाऊ शकतो, पण यातील अचित कुमार हा क्रूझवर नव्हता. त्याला घरून अटक करण्यात आली आहे. आर्यन तसेच अचित यांच्यात ऑनलाइन गेमिंगसंदर्भात चर्चा झाली. विशेष म्हणजे ही चॅटिंग १२ ते १४ महिन्यांपूर्वी झाली आहे, असा दावा रोहतगी आणि ॲड. अमित देसाई यांनी केला. मुकूल रोहतगी यांनी न्यायालयात पंचनामा वाचून दाखवला. न्यायालयाने रोहतगी यांना आर्यन खानच्या मोबाइलमधील व्हॉट्सॲप चॅटिंगचा क्रूझ पार्टीशी काय संबंध आहे?, असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना आर्यन खानची चॅटिंग ही सगळी क्रूझ पार्टीच्या आधीची असल्याचा दावा रोहतगी यांनी केला.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …