मुंबई – अविवाहित राहू नका. लग्न करा. लग्न केल्याने डोके शांत राहते, असे सांगतात ज्यांनी लग्न केले नाही त्यांनी देशाला वेठीस धरले आहे, अशा शब्दांत एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार हल्ला चढवला. मुंबईत शनिवारी एमआयएमने तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला संबोधित करताना असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार हल्लाबोल चढवला. यावेळी त्यांनी तरुणांना अविवाहित न राहण्याचा सल्ला दिला. उद्या तुम्ही लग्न करणार आहात. करणार ना? अविवाहित राहू नका. जेवढे आहेत तेवढ्यांनी देशाला त्रस्त केले आहे. त्यामुळे लग्न करा. लग्न केल्यावर डोकेही हलके होते, असा चिमटा ओवैसी यांनी काढला.
यावेळी ओवैसी यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावरून काँग्रेसला धारेवर धरले. तुम्हाला धर्मनिरपेक्षता दाखवली गेली. भारतातील मुसलमानांना विचारतो धर्मनिरपेक्षतेने तुम्हाला काय मिळाले?, धर्मनिरपेक्षतेने तुम्हाला केवळ घोषणा दिल्या, आश्वासने दिले, पण आरक्षण मिळाले नाही, मशीद मिळाली नाही. मशीद पाडणाऱ्यांना शिक्षा मिळाली नाही. न्याय मिळाला नाही, पण तरीही आपण धर्मनिरपेक्षतेला भुलतो. केवळ संविधानातील सेक्युलॅरिझमला मानतो. मी पॉलिटिकल सेक्युलॅरिझमला कधीच मानत नव्हतो आणि मानणार नाही. मुसलमानांनो पॉलिटिकल सेक्सुलॅरिझम धुडकावून लावा. तुम्हाला शासन कर्ती जमात बनायचे आहे, असं त्यांनी सांगितले.
भाजप सत्तेत असताना जे मुस्लिमांच्या आरक्षणाची मागणी करीत होते, ते आज सत्तेत आहेत, पण कुठे आहे आरक्षण?, तुम्ही आम्हाला मतदान केले नाही. तुम्ही कुणालाही मतदान करावे हा तुमचा हक्क आहे, पण तुम्ही कधीपर्यंत फसवले जाणार आहात. बाबरी मशीद पडल्यानंतर मुंबईत हिंसाचार झाला त्यानंतर तरी तुमचे डोळे उघडायला हवे होते, पण तुम्ही सर्व विसरला, असे त्यांनी सांगितले. आरक्षण आपल्याला हवे आहे. संविधानाने मुलभूत अधिकार दिले आहेत. त्यात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत, त्यांना आरक्षण देण्याची तरतूद आहे. तुम्ही कुणालाही आरक्षण द्या. त्याला आमचा विरोध नाही, पण न्यायालयाने सांगितल्यानंतरही आम्हाला आरक्षण दिले जात नाही असे का? मुसलमानांना एवढा दुजाभाव का? असा सवालही त्यांनी केला. तसेच मुस्लीम समाज शिक्षण, नोकरी आणि संपत्तीत इतरांच्या तुलनेत कसा मागे आहे, याची आकडेवारीही त्यांनी वाचून दाखवली.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …