बालरंगभूमी ही स्वतंत्र आहे. मोठ्यांचीच नाटके छोट्यांनी करायची अशी प्रथा असताना खास बालरंगभूमीसाठी मान्यवर लेखकांकडून छोट्यांची नाटके लिहून घेत बालरंगभूमी समृद्ध करण्याचे काम सुधा करमरकर यांनी केले. त्यांच्या या योगदानाने अनेक उगवते तारे मराठी रंगभूमीला दिले. हे फार मोठे सुधातार्इंचे योगदान होते. लहान मुलांच्या रक्तात अभिनय आणि नाट्य भिनवण्याचे काम सुधा करमरकर यांनी केले. सुधा करमरकर म्हणजे बालरंगभूमीची कार्यशाळा होती. या कार्यशाळेतून मराठी रंगभूमीचा पडदा विशाल केला होता. नाटक हे बाल वयात समजले, तर मोठ्या वयात अधिक प्रगल्भ कलाकार तयार होतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. बालरंगभूमी समृद्ध करतानाच त्यांनी बालरंगभूमीसाठी नाटके लिहिण्यास लेखकांना प्रवृत्त केल्यामुळे बालकांसाठी नाटके लिहिली गेली, ही साहित्यिक समृद्धी होती.
सुधा करमरकर यांचे घराणे मूळचे गोव्याचे. वडील तात्या आमोणकर हे गिरगाव-मुंबईतील साहित्य संघ या नाट्य संस्थेशी संलग्न होते. त्यामुळे सुधातार्इंना घरातूनच नाट्य सेवेचे बाळकडू मिळाले होते. त्यातच, तात्या आमोणकरांनी आपल्या सुधा आणि ललिता या दोन्ही मुलींना गायन आणि नाट्य शिकायला पाठवले होते. सुधा यांना त्या काळात पार्श्वनाथ आळतेकरांच्या कला अकादमीमध्ये दाखल केले गेले आणि त्यानंतर नृत्य शिक्षक पार्वतीकुमार यांच्या हाताखाली नृत्य शिक्षण घ्यायला लावले. वयाच्या अठराव्या वर्षी त्या भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य प्रकारात प्रवीण झाल्या होत्या. त्याचे फलित त्यांना ताबडतोबच मिळाले. मो. ग. रांगणेकरांच्या रंभा या पुनर्जन्मावर आधारित नव्या नाटकात त्यांना नृत्यकुशल नायिकेची, रंभेचीच भूमिका मिळाली, आणि त्यांची ती भूमिका गाजली.
वडील साहित्य संघात असल्यामुळे संघाच्या नाटकात छोट्या-मोठ्या भूमिका त्यांना कराव्या लागत. त्या काळात नटवर्य केशवराव दाते, नानासाहेब फाटक, मास्टर दत्ताराम, दुर्गाबाई खोटे अशा नाट्य क्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन सुधा करमरकरांना मिळाले. सुधाताईंनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवी प्राप्त केल्यानंतर, दामू केंकरे यांनी त्यांना मुंबईतील जे. जे. स्कूल आॅफ आर्ट्समध्ये (त्यांच्या नाटकातून काम करण्यासाठी) दाखल करून घेतले. त्यावेळी भारतीय विद्याभवनच्या आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धेत दामू केंकरे दिग्दर्शित उद्याचा संसार हे नाटक सादर केले गेले. त्या स्पर्धेत, सर्व नाटकांमधून निवड होऊन सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक सुधा करमरकरांना मिळाले.
अधिकचे नाट्य शिक्षण घेण्यासाठी सुधा करमरकर परदेशात गेल्या. त्यांनी अमेरिकेत जाऊन ‘बालरंगभूमी’ या संकल्पनेचा अभ्यास केला. तिथे त्यांनी मुलांची नाटके पाहिली आणि तिथूनच त्यांनी भारतात परत गेल्यावर काय करायचे ते ठरवून टाकले. शतकाहून अधिक वर्षांची परंपरा सांगणाºया मराठी रंगभूमीला मुलांचे वावडेच होते. नानासाहेब शिरगोपीकर मुलांना घेऊन गोकुळचा चोर हे नाटक करत असत. दामू अण्णा जोशीही मुलांना घेऊन नाटके करीत असत. अशा नाटकांचा उद्देश मुलांना सर्व भूमिका करायला मिळाव्यात एवढाच असे. मुलांचे एक वेगळे विश्व असते, त्यांची वेगळी कल्पनासृष्टी असते, त्यांची मानसिकताही वेगळेच रंग प्रकट करणारी असते हे काही माहीतच नव्हते. या वेगळेपणाची भूक भागेल असे प्रौढ नाटकापेक्षा सर्वस्वी वेगळे असलेले नाटक मराठी रंगभूमीवर नव्हतेच. त्यामुळेच शाळेतल्या समारंभातदेखील मुले दाढी, मिशा लावून किंवा कोट, पँट घालून मोठ्यांचीच नाटके करीत असत. त्यातील संवादांचा अर्थ मुलांना कळो ना कळो, संवाद हातवारे करून धडाधड म्हणायचे आणि आपापल्या भूमिका वठवायच्या, हेच त्यावेळचे बालनाट्य होते.
सुधाताई मायदेशी परतल्या आणि सगळी परिस्थितीच बदलली. त्यांनी साहित्य संघाच्या सहकार्याने २ आॅगस्ट १९५९ रोजी ‘बालरंगभूमी-लिट्ल थिएटर’ सुरू केले. बालनाट्य हे लहान मुलांच्या करमणुकीसाठी असून, ते वास्तव असावे म्हणून सुधातार्इंनी रत्नाकर मतकरी आणि इतरही काही नाटककारांकडून नाटके लिहून घेतली. ती शाळांच्या हॉलमध्येच नव्हे, तर व्यावसायिक नाट्यगृहांतही सादर केली. यातून मुलांची भरपूर करमणूक तर झालीच, पण मुलांचे नाटक कसे असावे, याचा धडा सुधातार्इंनी संबंधितांना घालून दिला. त्यांनी या लिट्ल थिएटरतर्फे बालनाट्य शिबिरांचे, स्पर्धांचे आयोजन केले.
सुधा करमरकरांनी मुंबईतील आपल्या वडिलांच्याच साहित्य संघ या नाट्यसंस्थेच्या साह्याने मधुमंजिरी हे मराठी रंगभूमीवरील खरेखुरे पहिले बालनाट्य सादर केले. रत्नाकर मतकरी यांनी ते लिहिले होते. सुधा करमरकर या नाटकाच्या केवळ दिग्दर्शिकाच नव्हत्या, तर त्या नाटकात त्यांनी चेटकिणीची अफलातून भूमिकाही केली होती. १९५९ साली रंगमंचावर आलेल्या या पहिल्या बालनाटकाने रंगभूमीवरील एका नव्या प्रवाहाचीच मुहूर्तमेढ केली. सुधा करमरकरांनी एकूण ३७ बालनाटकांची निर्मिती केली. त्यामुळे मराठी रंगभूमीवर बालनाट्याला समृद्ध करण्याचा मान सुधातार्इंकडे जातो.
सुधातार्इंचा हा वारसा कोणीतरी जपण्याची गरज आहे. रत्नाकर मतकरींनी अनेक बालनाट्ये लिहिली, सई परांजपेंनी लिहिली. तशी बालनाटके आता लिहिली गेली पाहिजेत आणि नवीन नाटके बालकांसाठी तयार झाली पाहिजेत. सुधातार्इंनी बालरंगभूमीसाठी दिलेली ही देणगी जपली पाहिजे.
तिसरी घंटा/ प्रफुल्ल फडके
9152448055\\