नवी दिल्ली – केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे सरकारला झुकावे लागले. अखेर एक वर्षानंतर केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आणि शेतकरी आंदोलनाला मोठे यश मिळाले. केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर शेतकरी घरवापसी करत आहेत. अशात शनिवारी शेतकरी आंदोलन मागे घेत असल्याची अधिकृत घोषणा शेतकऱ्यांनी केली असून, ११ डिसेंबर हा ‘शेतकरी विजय दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. कृषी मंत्रालयाचे सचिव संजय अग्रवाल यांच्याकडून पाठवण्यात आलेल्या पत्रानंतर आंदोलन स्थगित करण्यात येत असून, एका वर्षानंतर शेतकऱ्यांनी आपल्या घराची वाट धरली आहे.
शेतकऱ्यांनी सिंघू, गाझीपूर आणि टिकरी बॉर्डरवरील महामार्गावर लावलेले अडथळे दूर केले असून, तंबू हटवण्यात आले. एमएसपी आणि इतर मागण्या पूर्ण करणार असल्याचे केंद्र सरकारने लिखित दिल्यानंतर आंदोलन संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी सकाळी शेतकऱ्यांनी विजय मार्च काढत आंदोलनाला यश मिळाल्याबाबत आनंद व्यक्त केला. कृषी आंदोलन सुरू झाले, तेव्हा हजारोंच्या संख्येने शेतकरी सिंघू, टिकरी सीमेवर आपल्या गाड्या आणि ट्रक्टरसह पोहचले होते. सीमेवरच त्यांनी आपला मुक्काम ठोकला होता. गेल्या एका वर्षात हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब आणि इतर राज्यांतील शेतकरी आंदोलनस्थळी एकत्र राहत होते. आंदोलन स्थळच त्यांचे घर झाले होते. आता आंदोलन मागे घेतल्यानंतर वापस घरी परताना शेतकरी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे, शेतकऱ्यांनी सरकारला दिलेली आश्वासन पूर्ण करण्याची मुदत १५ जानेवरीपर्यंत दिली आहे. येत्या १५ जानेवरीला पुन्हा शेतकरी नेते बैठक घेणार आहेत. आश्वासने पाळली नाही तर पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.