आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघाने पिळले भाजपचे कान
नवी दिल्ली – भाजप हा पक्ष सांप्रदायिक आहे, अशी ओळख निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजप कंबर कसून कामाला लागला आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला आपला दृष्टिकोन बदलण्याचा सल्ला दिला आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरएसएसने पक्षाला आपली रणनीती ठरवण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. सध्या देशापुढे असलेल्या प्रश्नांप्रती अधिक संवेदनशील होण्याची गरज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बोलून दाखवली आहे. सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला गांभीर्याने घेऊन त्यावर तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उत्तर प्रदेशातले मंत्री आणि पक्षाचे काही नेते यांच्यासोबत नोएडामध्ये बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ स्वयंसेवकांनी मार्गदर्शन केले. वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी उत्तर प्रदेशात चाललेल्या शेतकरी आंदोलनाला शांतपणे हाताळावे, तसेच त्याबद्दल संवेदनशील भूमिका घ्यावी, असा सल्ला या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याआधीही सार्वजनिकरित्या शेतकरी आंदोलनाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. जाट आणि शिख यांच्यात शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करत आहेत, असा सूर यामुळे आळवला जात असल्याचे संघाने बोलून दाखवले होते. हे पक्षासाठी घातक ठरू शकते, असेही संघाने म्हटले होते. प्रमुख नेत्यांच्या अनेक गटांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान संघाचे संयुक्त सरचिटणीस कृष्ण गोपाल यांनी सांगितले की, पक्षाने आंदोलनकर्त्या शेतकºयांच्या बाबतीत काहीशी शांत आणि सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी.
भाजपलाही हे कळून चुकले आहे की, शेतकरी आंदोलनामुळे पंजाबमधल्या शिख समुदायात तसेच जाट समुदायात पक्षाबद्दल प्रचंड असंतोष आहे, मात्र तरीही पक्षाला असे वाटत आहे की, शेतकरी आंदोलन हा एकच मुद्दा निवडणुकीत प्रमुख भूमिका बजावणार नाही. त्यामुळे पश्चिम उत्तर प्रदेशातले जाट समुदायातले लोक पक्षालाच मत देतील, अशी आशा त्यांना आहे, मात्र नुकतेच घडलेले लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरण परिस्थिती अधिक बिकट करू शकते.