अमरावती – त्रिपुरा राज्यात कथित अत्याचाराविरोधात अमरावतीत शुक्रवारी दुपारी एका समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर १५ ते २० हजार लोकांनी निषेध मोर्चा काढला होता. या मोर्चाला हिंसक वळण लागले. यात शहरातील ५ ते ७ दुकानांची तोडफोड झाली व काही दुकानदारांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे शहरात तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नदेखील निर्माण झाला होता. शुक्रवारच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी भाजपने अमरावती शहर बंदचे आवाहन केले आहे. दरम्यान शुक्रवारच्या घटनेवर अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जनतेला शांततेच आवाहन केले आहे, तसेच कोणीही सामान्य जनतेला वेठीस धरू नये, घटनेची सखोल चौकशी होईल, कोणीही राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये, सर्वांना शांतता राखावी, असे आवाहन पालकमंत्री व महिला, बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे.