मुंबई – सध्या महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. अशातच आता हवामान खात्याने महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. २८ डिसेंबर रोजी औरंगाबाद, जालना, जळगाव, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, तर २७ डिसेंबर रोजी विदर्भातच तुरळक प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. याबाबत आयएमडीकडून हवामानाचे ताजे अपडेट जाहीर करण्यात आले आहेत.
यंदा उन्हाळ्यात आणि हिवाळ्यातही पाऊस बरसला आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही राज्यात पावसाच्या सरी बरसल्या होत्या. नुकतीच थंडी सुरू झाल्याने सर्वत्र तापमान खालावले आहे, मात्र पावसामुळे काही काळासाठी थंडी कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याआधी अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
देशभरात हुडहुडी; थंडीचा कडाका वाढला
उत्तरेकडील भागांत बर्फवृष्टीमुळे लेह-लडाख यांसारख्या जागांवर पारा उणे अंशांवर पोहोचला आहे. त्यासोबतच दिल्ली, राजस्थान, पंजाब, ओडिशा या राज्यांतही थंडी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये येत्या काही दिवसांत वाढत्या थंडीपासून दिलासा मिळू शकतो. आयएमडीने म्हटले की, ५ जानेवारी २०२२ पर्यंत भारतातील बहुतांश भागात थंडीची लाट राहणार नाही, पण २४ डिसेंबरपासून देशाच्या विविध भागांत थंडीची लाट येऊ शकते असे म्हटले आहे. आयएमडीने आपल्या एका अंदाजात म्हटले आहे की, २७ ते ३० डिसेंबरदरम्यान, सक्रिय पश्चिमी विक्षोभामुळे बिहारच्या अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.