राजकारणात युवापिढी येत नाही, असे म्हटले जाते. महिलांचे प्रमाण कमी असते, असे म्हटले जाते; पण मीरा-भार्इंदरमधील आकांक्षा वीरकर या तरुणीने राजकारणातच करिअर करायचे ठरवले आणि आपल्या लहान वयातच या क्षेत्रात पाऊल टाकले. मुलींना सरकारने पुरुषांच्या बरोबरीचा समान हक्क दिला आहे. त्यामुळे कला-क्रीडा व इतर सर्व क्षेत्रांत महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने कामगिरी बजावत नाव कमावले आहे. गेल्या काही वर्षांपासून तरुण पिढी राजकारणाकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, आदिती तटकरे, वर्षा गायकवाड यांनी लहान वयात हे क्षेत्र निवडले. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत करिअर म्हणून हे क्षेत्र आकांक्षाने निवडले.
आजकाल मुलींचा देखील राजकारणात मोठ्या प्रमाणात समावेश होत असल्याचे दिसत आहे. मीरा-भार्इंदर शहरात राहणारी आकांक्षा वयाच्या १९व्या वर्षापासूनच राजकारणात उतरली. राजकारणात येण्यासाठी आवश्यक असलेले समाजकारण तिने अचूक हेरले आणि समाजासाठी काम करायला सुरुवात केली. गोरगरीब दुबळ्यांची मदत करणे हा तिचा उद्देश आहे. आपण महाराष्ट्रात जन्माला आलो व आपण समाजाचे काही देणे लागतो, त्यामुळे राजकारणात उतरून आपण शक्य तितक्या लोकांना मदत करायची, असे आकांक्षा शंकर वीरकर हिचे स्वप्न आहे.
आकांक्षाला लहानपणापासूनच अभ्यासाची गोडी व सर्वांपेक्षा काही तरी वेगळं करून समाजात आई-वडिलांचं नाव मोठं करायचं ही मनात बाळगलेली जिद्द तिने ठेवली होती. आज शिक्षण घेऊन मीरा-भार्इंदर शहरातील लोकांची मदत करायची या उद्देशाने राजकारणात पदार्पण केले आहे. बीकॉमची पदवी घेऊन त्यानंतर फॅशन डिझायनरचं शिक्षण ती घेत आहे. वडील राजकारणात असल्याने घरात एक वेगळेच वातावरण होते. आकांक्षाने आपल्या आई-वडिलांनाच स्वत:चे आदर्श मानत ही सुरुवात केलेली आहे. तिने पूर्ण शिक्षण हे स्वत:च्या बुद्धीच्या क्षमतेवर कोणत्याही प्रकारची शिकवणी, क्लासेस कधीच न लावता घेतले आहे. शिक्षण चालू असतानाच विद्यार्थीदशेपासूनच युवा तरुणी आकांक्षानी राजकारणात उतरण्याचे ठरवले होते, कारण महिलांनी न घाबरता सर्व क्षेत्रांत उतरायला हवे, अशी तिची विचारधारा आहे.
गतवर्षी २०२० मध्ये तिने कोरोना महामारीच्या कठीण काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता लोकांची मदत करत एक उत्तम समाजसेवक काय असतो याचे उदाहरण दिले आहे. आपला आत्मविश्वास असेल, तर माणूस मेहनत करून कुठेही काम करून नाव कमवू शकतो, हे आकांक्षा वीरकरने सिद्ध करून दाखवले आहे.
आकांक्षाला वयाच्या १२व्या वर्षीच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाच्या रूपात राजकारणाचे बाळकडू मिळाले होते. आकांक्षाचे वडील तिच्याच वयाचे असल्यापासून कट्टर शिवसैनिक आहेत. आकांक्षाच्या लहानपणापासूनच घरात राजकारणी भगवे वातावरण होते. घरात वडीलच राजकारणी असल्यामुळे व बाळासाहेबांचे विचार मनात असल्याने आपणदेखील राजकारणात उतरून लोकांची सेवा करायची हा विचार आकांक्षा हिने लहाणपणीच मनात ठाम केला होता. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाच आपले प्रेरणास्थान मानून व वडिलांना आदर्श समजून आकांक्षा वीरकर हिने काही वर्षांपूर्वी युवा सैनिक म्हणून मीरा-भार्इंदरच्या राजकारणात काम करण्यास सुरुवात केली आहे. युवासैनिक म्हणून काम करत असताना, अनेक रक्तदान शिबिरे राबविले व नुसते शिबिरांचे आयोजन न करता स्वत: त्यात पुढाकार घेत प्रथम स्थानावर रक्तदान करत इतर तरुणींना देखील प्रोत्साहन दिले. लहान वयातच दूरदृष्टी ठेवून आपल्या परिसरातील अंध व अपंग व इतर कमकुवत लोकांना मदत करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आकांक्षाने प्रयत्न करत स्टॉल मिळवून दिले. आकांक्षा वीरकर नागोबा फाऊंडेशनमधून देखील समाजसेवेचे काम करत आहे. महाराष्ट्राची शान असलेला मर्दानी कुस्ती या खेळात मुलींनीदेखील जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे याकरिता परिसरातील तरुणींना भेटून त्यांना प्रेरणा देण्याचे काम आकांक्षा वीरकर करत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या २०२१ यावर्षीच्या वाढदिवसानिमित्ताने आकांक्षाने महिला व पुरुष यांच्या जंगी कुस्तीचे आयोजन भार्इंदर पश्चिमेच्या आखाड्यात केले होते व त्यात सहभाग घेणाºया खेळाडूंना गरम दूध पिण्यासाठी थर्मास बॉटल, मानधन, बक्षीसे दिली. कोरोनाच्या काळातदेखील लोकांना मास्क, सॅनिटायझर, रिक्षा चालक यांना पारदर्शक सुरक्षा किट वाटप करत शहरात युवासेनाप्रमुख आदित्य उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रेरणा घेऊन युवासैनिक म्हणून निरंतर काम सुरू ठेवलेले आहे.
राजकारणातही करिअर करता येते आणि काही वेगळी वाट जोपासता येते, हे दाखवून आकांक्षाने नव्या पिढीला आवाहनच केले आहे.
– अनिकेत देशमुख\\