दुबई – अफगाणिस्तानचा स्टार लेग स्पिनर राशिद खानच्या मते, आयसीसी टी-२० विश्वचषकात फिरकीपटूंचाच दबदबा असेल व तो म्हणाला की, जर त्यांचा संघ चांगली फलंदाजी करतील, तर ते कोणत्याही संघाला पराभूत करू शकतात.
राशिदला २०१७ साली वयाच्या १८व्या वर्षी आयपीएल फ्रँचायजी सनरायझर्स हैदराबादने आपल्या संघात निवडले होते व त्यानंतर त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली. आपल्या दुसऱ्या टी-२० विश्वचषकात भाग घेणाऱ्या राशिदच्या मते, फिरकीपटू यूएईच्या खेळपट्टीवर प्रभावशाली राहिलेत, जिथे सुपर-१२, सेमीफायनल व फायनल सामने खेळवले जातील. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत राशिद पुढे म्हणतो, येथील परिस्थिती फिरकीपटूंसाठी अनुकूल आहे. हा फिरकीपटूंचा विश्वचषक व्हायला हवा. याने कोणताच फरक पडत नाही की, येथील खेळपट्टी कशाप्रकारे तयार केली गेली आहे. ती नेहमीच फिरकीपटूंच्या फायद्याची असते. म्हणूनच या विश्वचषकात फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची असेल. राशिद पुढे म्हणाला, जसे आम्ही आयपीएलमध्ये पाहिले की, फिरकीपटूंनी आपल्या संघांना सामन्यात पुनरागमन करून दिले. मला वाटते की, विश्वचषकातही असेच होईल. सर्वोत्कृष्ट स्पिनर आपल्या संघाला पुनरागमन करून देऊ शकतात. अफगाणिस्तानला भारत, पाकिस्तान व न्यूझीलंडसह दुसऱ्या गटात ठेवण्यात आले आहे. राशिदच्या मते, सुपर-१२ मधील त्यांच्या प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजी फिरकी गोलंदाजाविरुद्ध चांगल्या प्रकारे खेळतात. त्यामुळे आम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागतील.