- वादळी वाऱ्यासह झोडपणार पाऊस
नवी दिल्ली – गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रासह दक्षिण भारत आणि भारताच्या पूर्व किनापट्टीवर झपाट्याने वातावरणात बदल होत आहे. सध्या बंगालच्या उपसागर परिसरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून, याचे रूपांतर जवाद चक्रीवादळात होत आहे. ‘जवाद’ चक्रीवादळ आज ओडिशा किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावर देखील जाणवणार असून, अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, ‘जवाद’ चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका आंध्र प्रदेशातील उत्तर किनारपट्टीवरील श्रीकाकुलम, विजयनगरम आणि विशाखापट्टणम या जिल्ह्यांना बसणार आहे. याशिवाय ओडिशातील गजपती, गंजाम, पुरी, नयागड, खुर्दा, कटक, जगतसिंगपूर आणि केंद्रपाडा या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. जवाद चक्रीवादळामुळे शनिवारीही आंध्र प्रदेश ते ओडिशादरम्यानच्या अनेक भागांना इशारा देण्यात आला होता. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा याबाबत म्हणाले की, जवाद चक्रीवादळ शनिवारी उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीजवळ पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता असून, हे वादळ ओडिशा आणि लगतच्या आंध्र प्रदेश किनारपट्टीपासून उत्तर-ईशान्य दिशेने पुढे सरकणार आहे, तर ५ डिसेंबरला म्हणजे रविवारी दुपारपर्यंत हे वादळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे.