भुवनेश्वर – भारतीय कर्णधार विवेक सागर प्रसादच्या मते, २४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या एफआयएच ज्युनियर हॉकी विश्वचषकात एकता व आपापसातील ताळमेळ आमच्या संघाची सर्वात मोठी ताकद आहे. ज्युनियर संघाने २०१८ व २०१९ मध्ये चांगली कामगिरी केली, पण २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे आमच्यासाठीही वेळ कठीण होता, असे प्रसाद म्हणतो. प्रसाद पुढे म्हणाला, त्यानंतर ही खेळाडूंनी एकत्रपणे सराव केला व लक्ष्य हे जेतेपद पुन्हा मिळवण्याचे आहे. आमच्यातील एकता व आपापसातील ताळमेळ सर्वोत्तम झाले आहे. संघातील पायाभूत सुविधा सुधारल्या आहेत. लखनऊमध्ये २०१६ मध्ये जेतेपद जिंकणारा भारतीय संघ पहिल्या दिवशी फ्रान्सविरुद्ध खेळेल. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य राहिलेला प्रसाद पुढे म्हणतो, मनिंदर सिंग, राहुल राजबर व संजय आमचे प्रमुख खेळाडू आहेत. प्रसादने २०१७ मध्ये पहिल्यांदा भारतीय पुरुष ज्युनियर संघाची कमान मलेशियातील सुल्तान जोहोर चषकात सांभाळली होती, जिथे भारत तिसऱ्या स्थानी राहिलेला. त्याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू म्हणून निवडण्यात आलेले. तो २०१८ साली भारतीय सीनियर संघात सामिल झाला. तो पुढे म्हणतो, २०१३ साली मध्य प्रदेशच्या इटारसीमध्ये माझ्या गावात एका छोट्या स्पर्धेवेळी अशोक ध्यानचंद प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी मला अकादमीत खेळण्याची संधी दिली. त्याच्या दोन वर्षांनंतर भारतीय ज्युनियर संघाच्या शिबिरासाठी माझी निवड झाली, पण मी कोर ग्रुपमध्ये जागा मिळवू शकलो नाही. त्यानंतर माझा कॉलर बोन फ्रॅक्चर झाला व पाच महिने मी खेळू शकलो नाही. पुनरागमनानंतर पुन्हा दुखापत झाली व डॉक्टर म्हणाले की, ही दुखापत चांगली होणार नाही. पण मी पुनरागमनावर ठाम होतो, ज्यासाठी माझ्या कुटुंबीयासह मित्रांनी खूप मदत केली.
One comment
Pingback: Data pengeluaran HK tercepat