नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टी ही कोणत्याही कुटुंबाशी जोडलेली पार्टी नाही, तर सेवा, संकल्प आणि समर्पणाशी जोडलेली पार्टी आहे, असा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकारिणी बैठकीच्या समारोपात दिला. मोदी म्हणाले, भाजप कार्यकर्त्यांना सामान्य माणसाच्या मनाच्या विश्वासाचा सेतू बनलं पाहिजे. तसेच, त्यांनी पक्षाच्या इतिहासाचा दाखला देत सांगितलं की, भाजपने केंद्रात आज जे स्थान मिळवलं आहे, त्याचं अतिशय मोठं कारण हे आहे की, सुरुवातीपासून आतापर्यंत भाजप हा सामान्य माणसाशी जुडलेला आहे.
भाजप ही कुटुंबावर आधारित पार्टी नाही. त्यामुळे भाजप ज्या मूल्यांना घेऊन चालली आहे, त्यामध्ये सेवा, संकल्प आणि समर्पण आहे. कुण्या एका विशिष्ट कुटुंबाशी जोडून नाही हे या पार्टीची परंपरा आहे. परंपरेला पुढे नेत व कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमामुळे आपण पुढे चाललो आहोत. त्यामुळे त्यांनी सांगितलं की, आगामी काळात भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना या विश्वासाला घेऊन वाटचाल करावी लागेल. कोविड काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्वात केवळ राजकारण नाही, तर सेवा परमो धर्म या तत्वानुसार काम केलं.
याचबरोबर, पंतप्रधान मोदी म्हणाले, भाजप सातत्याने जो आदर्श विचार घेऊन पुढे चालली आहे, त्याद्वारे लोकशाही व्यवस्था मजबूत केली आहे. पंतप्रधान मोदींनी आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समस्त कार्यकर्त्यांना उत्साहाने पक्षाचे काम पुढे नेण्याचं आवाहन केलं.
आगामी काळात ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांची देखील बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव यांनी पत्रकार परिषदेतून या बैठकीबाबत माहिती दिली.
बैठकीच्या पहिल्या सत्रात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे भाषण झाले, तर बैठकीच्या दुसºया सत्रात गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांचे प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांद्वारे आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण विषय मांडण्यात आला. राज्य सरकारकडून पाच वर्षांमध्ये जे काम करण्यात आलं, त्याचा मुख्यमंत्र्यांनी लेखाजोखा मांडला. याचबरोबर जनतेशी जुडण्यासाठी त्यांच्यात विविध विषय नेण्यासाठी, विविध वर्गांसोबत समन्वय साधण्यासाठी पार्टीकडून ज्या विविध योजना आखण्यात आल्या आहेत, त्याबाबत संपूर्ण माहिती तेथील प्रदेशाध्यक्षांनी दिली. या चार राज्यांशिवाय पंजाबच्या प्रदेशाध्यक्षांनी आगामी काळात भाजप तयारीनिशी सर्व जागांवर निवडणूक लढवेल, असं सांगितलं गेलं.