ठळक बातम्या

पुढील वर्षात भारताचा आर्थिक वृद्धीदर ९ टक्के राहण्याचा अंदाज

नवी दिल्ली – पुढील आर्थिक वर्षामध्ये भारताचा आर्थिक वृद्धीदर हा ९ टक्क्यांच्या आसपास राहू शकतो, असा अंदाज क्रेडिट सुइस या स्विस ब्रोकरेज फर्मने वर्तवला आहे. पुढील वर्ष भारतासाठी चांगले राहणार असून, अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळतील, असेही संस्थेने म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी भारताचा जीडीपी १०.५ टक्के राहणार असल्याची शक्यता देखील संस्थेने वर्तवली आहे. चालू आर्थिक वर्षांच्या शेवटी जीडीपीमध्ये वाढ होऊन, तो ९ टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज काही दिवसांपूर्वीच भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँके (आरबीआय)कडून वर्तवण्यात आला होता.
याबाबत बोलताना सुइसने सांगितले की, कोणत्याही देशाच्या आर्थिक वृद्धीदराबाबत अंदाज वर्तवणे हे संस्थेच्या धोरणामध्ये येत नाही. मात्र प्राप्त आकडेवारीवर नजर टाकल्यास पुढील वर्षामध्ये भारताचा आर्थिक वृद्धीदर हा ९ टक्क्यांच्या आसपास राहू शकतो, असा अंदाज आहे. अर्थतज्ज्ञ नीलकंठ मिश्रा यांनी म्हटले आहे की, पुढील काळात आर्थिक वृद्धीदर हा ९ टक्क्यांपर्यंत जाईलच, मात्र या आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत आर्थिक वृद्धीदरात आणखी वाढ होऊ शकते.
गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. सर्व उद्योगधंदे ठप्प झाल्याने अनेकांना आपले रोजगार गमावावे लागले. याचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला होता. आर्थिक वृद्धीदरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असून, उद्योगधंदे पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्था देखील रुळावर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाची तिसरी लाट न आल्यास आणि परिस्थिती सामान्य राहिल्यास चालू आर्थिक वर्षांच्या शेवटी जीडीपीमध्ये आणखी वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …