मुंबई – सीआयडीने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना समन्स बजावले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सीआयडीने त्यांना २ प्रकरणांत दोन वेगवेगळ्या दिवशी हजर राहण्यासाठी समन्स पाठवले आहे. एक समन्स मरिन ड्राइव्ह येथे श्यामसुंदर अग्रवाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीबाबत आहे, तर दुसरा ठाण्यातील खंडणीप्रकरणी आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांची सोमवार आणि मंगळवार अशी दोन दिवस चौकशी होणार आहे.
परमबीर सिंग यांना दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दोन समन्स पाठवण्यात आलेत. त्यापैकी मरिन ड्राइव्हला दाखल गुन्ह्याप्रकरणी सोमवारी (२९ नोव्हेंबर) चौकशी होईल, तर ठाण्यातील खंडणीप्रकरणी मंगळवारी (३० नोव्हेंबर) सीआयडी चौकशी करेल. एकूणच आता परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे सीआयडीने याआधी एका अॅट्रॉसिटी गुन्ह्याचा तपास करताना परमबीर सिंग यांचा चंदीगडला जाऊन जबाब नोंदवला होता. मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्याच्या मुंबई पोलिसांच्या अर्जाला परवानगी दिली आहे. परमबीर सिंग व रियाझ भाटी आणि विनय सिंग यांना फरार घोषित करण्यात आले होते. याआधी मुंबईच्या किल्ला कोर्टाने परमबीर सिंग यांना फरार घोषित केले होते. गोरेगावच्या एका प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्याविरोधात अनेक समन्स काढले होते, मात्र त्यानंतरही ते पोलिसांसमोर हजर झाले नव्हते. आता न्यायालयाने परमबीर सिंग यांच्यासह रियाझ भाटी आणि विनय सिंग यांनादेखील फरार घोषित केले आहे.
गोरेगाव खंडणी प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना गुन्हेगार घोषित करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने कोर्टात अर्ज दाखल केला होता. विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी मुंबईच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात अर्ज दाखल करून सिंग व्यतिरिक्त रियाझ भाटी आणि विनय सिंग ऊर्फ बबलू या इतर दोन आरोपींना गुन्हेगार घोषित करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.