मुंबई – पत्नी आपल्याशी बोलत नाही, या कारणातून एका तरुणाने आपल्या पत्नीची भररस्त्यात निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने पत्नीचा पाठलाग करत तिला, भररस्त्यात अडवले, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिने बोलण्यास नकार दिल्याच्या रागातून आरोपीने पीडितेवर धारदार चाकूने सपासप वार केले आहेत. हा हल्ला इतका भयंकर होता की, यामध्ये २१ वर्षीय पत्नी घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. यातच तिचा दुर्दैवी अंत झाला आहे. याप्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
आकांक्षा अक्षय आठवले असे हत्या झालेल्या २१ वर्षीय महिलेचे नाव आहे. संबंधित घटना मुंबईतील चेंबूर परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मृत आकांक्षा हिचा २०१९ साली आरोपी अक्षयसोबत विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवस आनंदात गेल्यानंतर, अक्षयचा आकांक्षासोबत सतत वाद होऊ लागला. याच रागातून आकांक्षा गेल्या काही महिन्यांपासून पतीपासून वेगळे आपल्या घरी राहू लागली. दरम्यानच्या काळात अक्षयने तिच्याशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला. पण आकांक्षाने त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. बुधवारी सकाळी आकांक्षा नेहमीप्रमाणे रिक्षाने आपल्या कामावर जात होती. यावेळी आरोपी अक्षय या रिक्षाचा पाठलाग करत होता. रिक्षा राहुलनगर परिसरात आल्यानंतर आरोपीने रिक्षाला अडवले आणि पत्नी आकांक्षाशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण यावेळीही आकांक्षाने पती अक्षयशी बोलण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या अक्षयने आपल्याजवळी धारदार चाकूने आकांक्षावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होती की, या घटनेच आकांक्षा जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत काही स्थानिकांनी तिला त्वरित सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, पण याठिकाणी डॉक्टरांनी उपचारपूर्वीच आकांक्षाला मृत घोषित केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती अक्षयविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास आरसीएफ पोलीस करत आहेत.