मुंबई – सरत्या वर्षाला निरोप देताना यंदा तरी नवे वर्षाचे स्वागत उत्साहात व जल्लोषात करू असे राज्यातील नागरिकांना वाटत होते, मात्र ओमिक्रॉनची पार्श्वभूमी व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाही ‘थर्टी फर्स्ट’च्या जल्लोषाला मुकावे लागणार आहे. बुधवारी त्याच अनुषंगाने राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली. राज्य शासनाने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत नाईट कर्फ्यू लावला आहे. त्यामुळे यंदाचा नववर्ष साजरे कसे करावे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यासंदर्भात आता राज्याच्या गृहखात्याने एक नियमावली जाहीर केली आहे. त्यात सर्व नियम देण्यात आले असून, नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे, असे आवाहन करण्यात आले आहेत.
काय आहे नियमावली?
- नव्या वर्षाच्या स्वागातील नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे.
- राज्यात २५ डिसेंबरपासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर बंदी घातली असून, याचे पालन करावे.
- सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
- नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात आसनक्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत, तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या २५ टक्के मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी आहे.
- कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, तसेच आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करावी.
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षांवरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.
- ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्रकिनारी, बागेत अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.
- नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये, तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
- नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.
- फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.
- कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.
- तसेच ३१ डिसेंबर २०२० व नूतन वर्ष सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. अशा सूचना गृह विभागामार्फत देण्यात आल्या आहे. नागरिकांनी यांचे पालन करावे, असे आवाहन गृह विभागामार्फत करण्यात आले आहे.