नवी दिल्ली – जगभरात कोरोना कहर सुरूच आहे, मात्र आता कोरोना रुग्णांमध्ये घट झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५ हजार ७८४ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर कोरोनामुळे २५२ लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे ४१ बाधित सापडले आहेत. देशात कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. सोमवारी महाराष्ट्रात आणखी दोन जणांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. दोघेही दुबईला गेले होते. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेतून गुजरातला परतलेल्या एका व्यक्तीलाही ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. देशात आतापर्यंत ४१ लोकांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ८८ हजार ९९३ झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाºयांची संख्या ४ लाख ७५ हजार ८८८ इतकी झाली आहे. आकडेवारीनुसार, सोमवारी ७ हजार ९९५ कोरोनाबाधित बरे झाले होते. त्यानंतर आतापर्यंत ३ कोटी ४१ लाख ३८ हजार ७६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत १३३ कोटींहून अधिक कोरोना विषाणू लसींचे डोस देण्यात आले आहेत. सोमवारी ६६ लाख ९८ हजार ६०१ डोस देण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत कोरोना लसीचे १३३ कोटी ८८ लाख १२ हजार ५७७ डोस देण्यात आले आहेत.