नवी दिल्ली – ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी त्रिपुरा हिंसाचारावरून भाजप सरकारवर टीका केली. त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. भाजपच्या अपयशामुळे दंगलखोरांनी मशिदींवर हल्ले केले. त्रिपुरा सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून त्रिपुरामध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. उत्तर त्रिपुरा जिल्ह्यात दोन ते तीन हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला होता. त्यामध्ये मोर्चेकऱ्यांनी मशिदीचे नुकसान केले होते.
कासगंज प्रकरणावर भाष्य करताना ओवैसी यांनी अल्ताफच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप केला. अल्ताफचा मृत्यू पोलीस कोठडीत झाला आणि पोलिसांनी सांगितले, की अल्ताफने शौचालयातील पाण्याच्या टाकीच्या पाईपचा वापर करून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांना निलंबित न करता अटक करण्यात यावी, अशी मागणी ओवैसी यांनी केली. त्रिपुरामध्ये होत असलेल्या हिंसाचाराचे मूळ हे बांगलादेशमध्ये आहे. बांगलादेशात नवरात्रौत्सवादरम्यान दुर्गा पूजेचे काही मंडप उद्ध्वस्त करण्यात आले होते. बांगलादेशात झालेल्या हिंसाचारात ७ जणांचा मृत्यू झाला होता. मंदिरांमध्ये नासधूस करण्यात आली होती. हिंदू अल्पसंख्याक असलेल्या बांगलादेशात शेकडो घर आणि मालमत्तांचे नुकसान करण्यात आले होते. त्याच रागातून त्रिपुरामध्ये आयोजित केलेल्या मोर्चामध्ये मशिदीचे नुकसान करण्यात आले. मुस्लिमांच्या संपत्तीचे नुकसान करण्यात आले. या पार्श्वभूमीर तणावग्रस्त भागांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली.