जळगाव – राज्यातील विविध जिल्ह्यांप्रमाणे जळगावातही भाजप व महाविकास आघाडीमध्ये चांगलीच जुंपली आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून भरपाई देण्यात येत आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीमध्ये जळगावचे नाव नसल्याचा आरोप करत खासदार उन्मेष पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली. शेतकरी नुकसान भरपाई यादीत जळगाव जिल्ह्याचे नाव नाही, हे गुलाबभाऊ झोपा काढतात काय?, असा सणसणीत टोला भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी लगावला. तर, उन्मेष पाटील यांनी सकाळी यावं त्यांना सर्व हिशोब देऊ, असं आव्हान गुलाबराव पाटील यांनी दिले. गुलाबराव पाटील यांनी यावेळी गिरीश महाजन यांच्यावर देखील टीका केली.
शेतकरी नुकसानभरपाई यादीत जळगाव जिल्ह्याचे नाव नाही, हे गुलाबभाऊ झोपा काढतात काय? त्यांना लाज वाटली पाहिजे, असा सणसणीत टोला भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी लगावला. गुलाबराव पाटील हे पालक आहेत की बालक आहेत, असा सवाल उन्मेष पाटील यांनी केला. शेतकरी मोर्चामध्ये बोलताना ते म्हणाले, गिरीशभाऊ महाजन मंत्रिमंडळात असताना जिल्ह्यात सिंचनासाठी पैसे आणले, परंतु पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एक पैसाही आणला नाही. एक वेळ या गुलाबभाऊंचा आवाज असायचा ते शिंगाडा मोर्चा काढायचे मात्र आता ते सोंगाडे मंत्री झाल्याचा आरोप उन्मेष पाटील यांनी केला.