- – पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता
मुंबई – सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे, तसेच शाळेला पडलेल्या दिवाळीच्या सुट्ट्या देखील लवकरच संपणार आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाकडून पहिलीच्या वर्गापासून सरसकट शाळा सुरू करण्यासंदर्भातील हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. पहिलीपासून शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असून, टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
मागील अनेक महिने कोरोना विषाणू संसर्ग सुरू झाल्यापासून शाळा बंद होत्या. अनलॉक प्रक्रियेनंतर राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू केल्या आहेत. आता कोरोनाचे संकट दूर होताना दिसत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणात राज्याने आघाडी घेतली आहे. त्यामुळे पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळ आणि टास्क फोर्स यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शालेय शिक्षण विभाग पहिलीपासून वर्ग सुरू करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेऊ शकतो, असे समोर येत आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास साधता यावा, यासाठी शासनाने ‘आदर्श शाळा’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला असून, मंगळवारी यासंदर्भात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. शाळांच्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणासाठी राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानच्या अंमलबजावणीचा आढावा घेतल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. पहिल्या टप्प्यात मराठवाडा विभागातील निजामकालीन शाळांची दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत, असे देखील त्या म्हणाल्या. महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.