पुणे- राज्यातील कोविड- १९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आई-वडिल गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी व बारावी परीक्षेचे शुल्क माफ करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. विशेष बाब म्हणून ही मान्यता देण्यात आली असून यासाठी होणारा खर्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उपलब्ध असलेल्या निधीतून भागविण्यात यावा, असे राज्य शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
अनेक विद्यार्थ्यांनी आपले आई-वडिल गमावले आहेत. अशा विद्यार्थ्यांना दहावी व बारावीच्या परीक्षेचे शुल्क भरण्यात अडचणी येऊ शकतात. परीक्षेचे शुल्क भरू न शकल्यामुळे परीक्षेपासून वंचित राहिल्यास त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळा येवून शैक्षणिक वाटचाल खंडित होण्याती शक्यता आहे. हे लक्षात घेऊन शुल्कमाफीचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्य शिक्षण मंडळामार्फत सन २०२१-२२ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे.