स्थानिक पातळीवर तडजोड नाही
मुंबई – महाविकास आघाडीमध्ये घटकपक्ष म्हणून सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसने अखेर महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळ आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा किल्लाही काँग्रेस एकट्याने लढवणार आहे.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवा, असे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्ष यांना दिले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत स्थानिक पातळीवर परस्पर निर्णय घेऊ नयेत. कसल्याही तडजोडी करू नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुका रंगतदार होणार आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गेल्या कित्येक दिवसांपासून स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी ठाम होते. त्यांनी वारंवार घटक पक्षातील सहकाऱ्यांना कोंडीत पकडले होते. त्यांच्यावर टीकाही केली होती. आता त्यांनी आक्रमक होत थेट आदेशच दिल्याने सारे चित्र स्पष्ट झाले आहे. आगामी काळात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक या महत्त्वाच्या शहरांमध्ये महानगरपालिका निवडणुका आहेत.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसने पहिल्यांदाच स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे या आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष काय करणार? याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांमध्ये आघाडी होणार का याचीही चर्चा रंगत आहे; मात्र मंगळवारी सातारा जिल्हा बँक निवडणुकीत झालेला प्रकार पाहता शिवसैनिक नाराज आहेत. त्यामुळे ही शक्यता कमी वाटते.
काँग्रेसच्या भूमिकेमुळे येणाऱ्या काळात भाजप-शिवसेना युती होणार का, या चर्चेलाही हवा मिळण्याची शक्यता आहे; मात्र दोन्ही पक्षांमध्ये तूर्तास वाढलेला दुरावा पाहता हे एवढे सहज आणि सोपे नाही. त्यामुळे युतीची शक्यता तशी धुसरच आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …