लखनऊ – आपल्या वकृत्व शैलीने अनेक सभा गाजवणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील गुन्हेगारांना इशारा दिला होता. एकतर स्वेच्छेने तुरंगात जाण्याचा मार्ग निवडा किंवा मरण स्वीकारा, ही धमकी वजा चेतावणी दिल्यानंतर अनेक गुन्हेगारांच्या पायाखालची वाळूच सरकली. अशात कैराना येथील गुंड असलेल्या फुरकानने न्यायालयासमोर आत्मसमर्पण केल्याची घटना घडली आहे, तसेच कुख्यात माफिया सुशील मिशी यानेही आत्मसमर्पण केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
योगी सरकारद्वारे सातत्याने माफियांवर कारवाई सुरू आहे. माफियांना अटक करून त्यांच्या बेकायदेशीर मालमत्तांवर बुलडोझर चालवला जात असून, सरकार मालमत्ता ताब्यात घेत आहे. अनेक माफियांना तुरुंगात पाठवले जात असून, अनेक जण चकमकीत मारले जात आहेत. त्यामुळे सरकारकडून होत असलेल्या कारवाईमुळे गुन्हेगार आता हादरले असून, आत्मसमर्पण करण्याचे प्रमाण वाढले आहे. सहारनपूर विभागाचे डीआयजी डॉ. प्रीतींदर सिंग यांनी सांगितले की, फुरकान आणि सुशील मिशाने कारवाईच्या भीतीने आत्मसमर्पण केले. त्यांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली असून, अन्य बेनामी मालमत्तांची चौकशी सुरू आहे. कुख्यात सुशील मिशा आणि फुरकान यांचा मोठा गुन्हेगारीचा रेकॉर्ड आहे. माफियांना आश्रय देणारे आणि त्यांना सहकार्य करणारेही पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांचीही ओळख पटवून त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल, असे डीआयजींनी सांगितले.