चक्क पालकमंत्र्यांच्या गाडीने प्रवास
मुंबई – राज्य परिवहन महामंडळ (एसटी) राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासह विविध मागण्यांसाठी राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असून, काही ठिकाणी एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. मात्र, एखाद्या डेपोमधून २ किंवा ३ एसटी सुटत असल्याचे चित्र आहे. त्यात राज्यामध्ये आता शाळा सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेमध्ये जाण्यासाठी सर्रास एसटी बसचा वापर करतात. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. ८ ते १० किलोमीटर पायी प्रवास करून शाळा गाठावी लागत आहे.
असाच एक अनुभव अमरावती जिल्हामध्ये आला असून, शाळेमध्ये जाण्यासाठी विद्यार्थी बसची वाट पाहत रस्त्यावर उभे होते. त्याचवेळी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर या अमरावती-नागपूर मार्गावरून तीवसाकडे जात होत्या. त्यावेळी त्यांना काही विद्यार्थी रस्त्यावर थांबलेले दिसले आणि हे विद्यार्थी बसची वाट पाहत असल्याचे यशोमती ठाकूर यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी कुठलाही विचार न करता विद्यार्थ्यांची विचारपूस करत चक्क आपल्या गाडीमध्ये विद्यार्थ्यांना बसवून फत्तेपूरला सोडले. या विद्यार्थ्यांच्या प्रवासासोबत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करा, मोठे अधिकारी व्हा म्हणत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.