सांगली – ज्या पद्धतीने मुंबईतील मिल कामगारांचा संप चिघळवला व शेवटी अनिर्णयीत परिस्थितीत आणून ठेवला. नंतर मिल मालकांसोबत मिलीभगत करत जमिनी विकून करोडोंची टक्केवारी गोळा केली होती. अगदी त्याच हेतूने एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळवून विविध शहरांतील करोडोंच्या जमिनींची विल्हेवाट लावण्याचा डाव अनिल परबांचा दिसत असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्र्यांवर केला आहे.
शुक्रवारी अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना अखेरचे अल्टीमेटम देत सोमवारी कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. त्याच्या एक दिवसानंतर पडळकरांनी हा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, परिवहन मंत्री अनिल परब यांनी आपले अपयश झाकण्यासाठी, मी आणि सदाभाऊ खोत एसटी कर्मचाऱ्यांची डोकी भडकवत आहोत, असे वारंवार आरोप केले; पण तीन आठवड्यांचा कालावधी गेल्यानंतरसुद्धा आपल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात मंत्री म्हणून ते अपयशी ठरलेत. आता ते मुघलशाही पद्धतीने मेस्मा कायदा लावण्याची धमकी देत आहेत, तसेच माझ्या भावाला बेकायदेशीरपणे सांगली जिल्हाबंदी केली आहे, असा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले, ज्या पद्धतीने राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत अधिकाऱ्यांमार्फत माझ्यावर दबाव आणण्यासाठी माझ्या भावाला बेकायदेशीरपणे सांगली जिल्हाबंदी केली आहे. त्याच चलाखीचा वापर करत जर खरोखर मनापासून कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला असता, तर आज नक्कीच काही मार्ग निघाला असता. आता पडळकर यांच्या आरोपानंतर अनिल परब त्यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.