मुंबई – ईडीने भाजप नेते किरीट सोमय्या यांना अधिकृत प्रवक्ता केले आहे का?, असा थेट सवालच राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिकांनी आपल्या घरी ईडी किंवा इतर केंद्रीय तपास यंत्रणांची धाड पडणार असल्याचे एक सूचक ट्विट केल्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. अशात शनिवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली, तसेच वक्फ जमीन घोटाळा प्रकरणात भाजपच्या एका नेत्यावर कारवाई होणार असल्याचे भाकितही मलिक यांनी यावेळी केले.
मागील काही दिवसांपासून भाजपचा नेता ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी छापामारी करत असल्याचे पत्रकारांना सांगत आहे. वक्फप्रकरणी ईडी माझ्या घरी येणार, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले. यावेळी ईडीने किरीट सोमय्यांना अधिकृत प्रवक्ता केले का?, असा प्रश्नही त्यांनी विचारला. ईडीने बोलावल्यास मी स्वत: त्यांच्या कार्यालयात जाणार असल्याचे स्पष्ट करत मलिक म्हणाले की, ईडीने अधिकृत माहिती द्यावी, मीडियात बातम्या पेरून राज्याला बदनाम करण्याचे काम बंद करावे. नवाब मलिक यांनी वक्फ जमीन घोटाळ्याबाबतही भाष्य केले. पुणे वक्फ प्रकरणात ईडीने तपास केला. वक्फ बोर्डाच्या सात कार्यालयांत छापे टाकले. ईडीने वक्फच्या एका अधिकाऱ्याला दोन दिवस बोलावले आणि चुकीच्या पद्धतीने एफआयआर दाखल केला असल्याचे मलिक यांनी म्हटले, तसेच वक्फच्या प्रकरणात लवकरच एका भाजप नेत्यावर कारवाई होणार असल्याचा गौप्यस्फोट मलिक यांनी यावेळी केला.