काळ हा सर्व गोष्टींवरचा इलाज आहे असे म्हटले जाते. काळानुरूप माणसाला आयुष्यातील वाईट घटनांचा विसर पडतो आणि तो सावरू लागतो. हे जरी खरे असले तरी अशा काही गोष्टीही आयुष्यात घडून जातात ज्या विसरणे अशक्यप्राय असते. विशेषत: आयुष्यातून निघून गेलेल्या आपल्या अतिशय प्रिय व्यक्तीचे विस्मरण होणे अवघडच नाही तर अशक्य असते. असेच काहीसे सुतापाच्या बाबतीतही घडत आहे. दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा २९ एप्रिल २०२० रोजी कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने मृत्यू झाला होता. परंतु इरफानच्या जाण्याने त्याची पत्नी सुतापा सिकंदर हिचे जग मात्र थांबल्यासारखे आहे. ती सोशल मीडियावर नेहमी आपली मनस्थिती व्यक्त करताना दिसून येते. अलीकडेच सुतापाने फेसबुकची मेमरी शेअर करताना एक पोस्ट लिहून इरफानची आठवण काढली आहे.
मुळात इरफान स्टारर चित्रपट करीब करीब सिंगलला नुकतीच चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या दरम्यान सुतापाने फेसबुक मेमरीमध्ये इरफान खानच्या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला होता. त्याचबरोबर तिने लिहिले आहे,’जेव्हा झोप न येण्याचा आजार दीड वर्षानंतरही कायम राहतो आणि फेसबुक दरदिवशी एका नव्या आठवणीचा दरवाजा उघडतो. साहिर साहेब म्हणतात,’तुम होते तो ये होता…’ इरफानला ही कविता कुठेतरी ऐकवायची होती. विद्यार्थी काळात अमिताभ बच्चन साहेबांचा आयकॉनिक आवाज अनेकदा कानावर पडायचा आणि इरफानला त्यावर अचंबा वाटायचा. परंतु काही प्रवास अचानक थांबतात आणि आपल्याला सोडून देतात. काही लोक इतके जवळ असतात की त्यांच्याशिवायही ते आयुष्यात जवळच असतात. हॅशटॅग इरफान…’ इरफान अखेरच्या वेळेस अंग्रेजी मीडियम या चित्रपटात दिसून आले होते या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान इरफान कॅन्सरशी लढा देत होते. हा त्यांचा अखेरचा चित्रपट होता.