ठळक बातम्या

आम्ही निवडणूक गांभिर्याने घेतली नाही: शरद पवारांनी ठेवले मर्मावर बोट

महाबळेश्वर – सातारा जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. जावळी सोसायटी गटातून शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला, तर ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली. शशिकांत शिंदे यांना २४, तर रांजणे यांना २५ मते मिळाली. शिंदे यांच्या पराभवानंतर समर्थक चांगलेच भडकले होते. त्यांनी राष्ट्रवादीच्याच कार्यालयावर दगडफेक केल्याची घटना मंगळवारी घडली होती. त्यानंतर शिंदे यांनी समर्थकांच्या कृ त्यावरून दिलगिरीही व्यक्त केली होती. दरम्यान, शिंदे यांच्या या पराभवावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे.
शशिकांत शिंदे यांच्या पराभवाबाबत पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला असता, मी काही त्याच्या खोलात गेलो नाही; पण मला असे वाटते की, शिंदेंनी ही निवडणूक अधिक गांभीर्याने घ्यायला हवी होती, असे शरद पवार म्हणाले. शशिकांत शिंदे यांनी निवडणूक हवी तेवढी गांभीर्यानं घेतली नाही, त्यांनी निवडणूक गांभीर्यानं घ्यायला हवी होती, असे पवार म्हणाले. शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर केलेल्या दगडफेकीनंतर शरद पवार यांनी मंगळवारी संध्याकाळी जिल्ह्यातील नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शशिकांत शिंदेही उपस्थित होते.
दुसरीकडे गृहराज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभुराज देसाई यांनाही या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. त्याबाबत विचारले असता, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढलोच नव्हतो. बँकेचा विषय काढला, तर आम्ही पक्ष म्हणून निवडणूक लढवली नव्हती. सहकार पॅनल म्हणून निवडणूक लढवली होती. त्यात सगळे दिसत होते की, कोण कुणाला मदत करतेय. साधारणत: महाराष्ट्रात सहकाराच्या निवडणुकीत पक्ष हा विषय आम्ही घेत नाही, असे पवार यांनी सांगितले. सांगलीतील निकाल चांगले लागले, म्हणत शरद पवारांनी सांगलीतील जिल्हा बँकेच्या निकालांचे कौतुक केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …