मुंबई – कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगाची धाकधूक वाढवली आहे. अशात राज्याने देखील कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सुधारीत गाइडलाइन्स जारी केल्या. त्यानंतर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप कुमार व्यास यांना पत्र लिहिले आहे. ३० नोव्हेंबर रोजी राज्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सवाल उपस्थित केले आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांकरीता राज्य सरकारकडून जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांवर केंद्राचा आक्षेप आहे. ओमिक्रॉनसंदर्भात केंद्राच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्याची सूचना, सुधारित नियम लागू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्याच्या मार्गदर्शक सूचना इतर राज्यांच्या गाइडलाइन्सशी साधर्म नसल्याचा यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे.
विमानतळावर डोमेस्टिक प्रवाशांकरता ७२ तासांपर्यंतचा आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे बंधनकारक आहे. यापूर्वी लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागत होते. मात्र आता मुंबई विमानतळावर ७२ तासांपर्यंतचा कोविड निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे सक्तीचे आहे. रिपोर्ट नसल्यास विमानतळावर कोविड टेस्ट केली जाणार आहे. यापूर्वीच्या राज्य शासनाच्या आदेशानुसार, दक्षिण आफ्रिका, रिस्क कंट्रीमधून येणाऱ्या प्रवाशांचे सात दिवस संस्थात्मक क्वारंटाइन आणि त्यानंतर १४ दिवस होम आयसोलेशन असणार आहे. तसेच ३० नोव्हेंबरला राज्य सरकारने ओमिक्रॉनसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. ज्यात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर आल्यानंतर आरटीपीसीआर करणे बंधनकारक, कोणत्याही देशाचा असला, तरी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आरटी-पीसीआरचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला, तरी देखील १४ दिवस होम क्वारंटाइन राहावे लागेल. मुंबईहून कनेक्टींग फ्लाइटकरिता देखील आरटीपीसीआर करणं बंधनकारक, महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक डॉमेस्टिक फ्लाइटमधील प्रवाशांना ४८ तासाआधी आरटीपीसीआर चाचणी अहवाल करणे बंधनकारक, अशा अटी जारी करण्यात आलेल्या. आता राज्य सरकार केंद्र सरकारच्या भूमिकेवर काय निर्णय घेते, ते पाहणे उत्सुकतेचे असेल.