‘चमचा’ ज्या भांड्यात असतो, त्यालाच तो रिकामा करतो. ‘चमच्या’ पासून सावध राहा!
येत्या दोन-तीन महिन्यांत पाच राज्यांतील निवडणुका होणार आहेत. कोणत्याही निवडणुका जवळ आल्या की पक्षांतराचे, आयात-निर्यातीचे प्रकार वाढतात. तसे ते आता होताना दिसत आहेत. गोव्यासारखे छोटे राज्य, पण महत्त्वपूर्ण राज्यात आता तशा हालचाली दिसत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आपली सत्ता टिकवण्याचे फार मोठे आव्हान समोर असलेल्या भारतीय जनता पक्षाने मंगळवारी काँग्रेसचा एक बडा मासा रवी नाईक यांच्या रूपाने गळाला लावला. अर्थात, हे अनपेक्षित नव्हते, कारण गेल्या वर्षीच रवींचे दोन्ही पुत्र भाजपवासी झाले होते आणि स्वत: रवी यांनीही काँग्रेस नेतृत्वापासून गेला बराच काळ फारकत घेतलेली दिसून येत होती. त्यामुळे हा भाजप प्रवेशाचा सोपस्कार फक्त बाकी होता असेच म्हणावे लागेल. पण भाजपची ही आयात चालली आहे, त्यातून ते काय सिद्ध करत आहेत हे अनाकलनीय आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अशीच मेगा भरती भाजपने केली होती, पण सत्तास्थापनेपासून त्यांना दूर राहावे लागले. त्यामुळे हे आयात केलेले नेते सांभाळण्याचे जिकिरीचे काम आज त्यांना करावे लागते आहे.
म्हणजे स्वत:चे आमदार पुन्हा निवडून येण्याच्या शक्यता जसजशा धूसर व्हायला लागल्या, तसतसे विरोधकांमधून आयते उमेदवार गोळा करण्यामागे भाजप नेतृत्व लागल्याचे दिसू लागले. मतदारसंघात पुरेसा प्रभाव असलेले आणि स्वत:च्या बळावर निवडणूक जिंकू शकतील, असे नेते जवळ करून आपले घसरणारे संख्याबळ वाढविण्याची ही केविलवाणी धडपड आहे. जे प्रकार पूर्वी काँग्रेस करत होती, तेच प्रकार आज भाजप करताना दिसत आहे. जिंकून येण्याचा निकष आणि खर्च करण्याची तयारी यावर उमेदवारी देणे, आयात करणे हा प्रकार मूळच्या भाजपच्या विचारसरणीशी अत्यंत विसंगत असा आहे. भाजप हा संघ परिवारातून कार्यकर्ते, नेते घडवणारा पक्ष असताना आज त्यांना नेते घडवण्याऐवजी आयात करावे लागतात हे आश्चर्यकारक असेच आहे. अर्थात हे फक्त गोव्यातच घडते आहे असे नाही, तर महाराष्ट्रात तेच केले आहे. निष्ठावंतांना जुन्या नेत्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचे प्रकार महाराष्ट्रात घडले.
गोव्यातील येत्या निवडणुकीत विरोधक वेगवेगळे लढतील आणि त्याचा फायदा मतविभाजनात होऊन भाजप आरामात जिंकेल, असे गणित मांडणाºयांना विरोधकांच्या एकत्रीकरणाने हादरे द्यायला सुरुवात केली आहे. खरंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष जवळ येण्याची आशा भाजपने बाळगली होती, पण तो तृणमूल काँग्रेससारख्या विरुद्ध विचारसरणीच्या पक्षाला जवळ करायला तयार झाला आहे. त्याचवेळी गोवा फॉरवर्डने काँग्रेस फार भाव खात असूनही युतीसाठी त्याचीच मनधरणी चालवलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची काँग्रेसशी युती झाल्यात जमा आहे. विरोधकांच्या एकजुटीच्या अशा प्रयत्नांमुळे भाजपला आपले मिशन २२ पूर्ण करणेही किती अवघड आहे, याची जाणीव झाली आहे. त्यामुळेच जयेश साळगावकर, रवी नाईक, गोविंद गावडे अशी नवी मंडळी पक्षात डेरेदाखल करून का होईना, पण सरतेशेवटी विजयी संख्याबळ वाढवण्याचा हा सारा आटापिटा चाललेला आहे. मागच्या पाच वर्षांत दुय्यम स्थानावर असूनही भाजपने सत्ता स्थापन केली होती. कालांतराने काँग्रेसच्या आमदारांना एक गठ्ठा भाजपमध्ये घेतले, पण ही विचारांशी फारकत घेतल्याची गोष्ट आहे.
खरंतर काँग्रेसमधील रवी नाईक हे तेथील भंडारी समाजाचे एक प्रभावशाली नेते आहेत. दोन वेळा गोव्याचे मुख्यमंत्री पदही त्यांनी भूषविले. यापैकी एकदा ९४ साली राज्यपाल भानुप्रकाश सिंहांच्या कृपेने ते मुख्यमंत्री झाले खरे, परंतु अवघ्या सहा दिवसांत सत्तेवरून पायउतार होत औटघटकेचे मुख्यमंत्री बनण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर नोंदवला गेलेला आहे. रवींचा हा भाजप प्रवेश काही पहिल्यांदा होत नाही. यापूर्वी २००० सालीही त्यांनी असाच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे अशा धरसोड प्रवृत्तीच्या नेत्यांना जवळ करण्यात भाजप आपला वेळ का वाया घालवत आहे हे अनाकलनीय आहे. ज्यांना आता आग्रहपूर्वक पक्षात घेतले त्याच रवी नाईकांच्या विरुद्ध भाजपने केवढे मोठे रान पेटवले होते. आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्कर अटालाची मैत्रीण लकी फार्महाऊसच्या मुलाखतीतील रॉय म्हणजे रवी नाईक यांचाच पुत्र असल्याचे सुचविणारी प्रचंड हाकाटी तेव्हा भाजप नेत्यांनी चालवली होती, परंतु हेच रॉय भाजपवासी होताच सगळे चिडीचूप झाले. म्हणजे महाराष्ट्रात ज्याप्रमाणे भाजप विरोधक त्यांच्यावर टीका करतात की, भाजपमध्ये गेल्यावर भ्रष्टाचारी पवित्र होतात, तसाच प्रकार गोव्यातही झालेला आहे. ही तयार होत असलेली भाजपची विचारसरणी मूळच्या भाजपशी विसंगत अशी आहे.
रवींच्या भाजप प्रवेशाचा भाजपला नक्की फायदा काय?, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. आम आदमी पक्षाने भंडारी मुख्यमंत्री करण्याची घोषणा करून अडचणीत आणलेल्या भाजपला राज्यात तीस टक्के लोकसंख्या असलेल्या या सर्वांत मोठ्या समाजाला आकृष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे आत्यंतिक गरजेचे ठरले होते. त्यामुळेच भंडारी कार्ड वापरण्याचा हा निर्वाणीचा प्रयत्न भाजपने चालवलेला आहे. सध्याच्या निवडणुकीत रवी नाईकांचा हा पक्षप्रवेश सर्व दृष्टींनी लाभदायक ठरणार आहे, निदान त्यात नुकसानकारक असे तरी काही नाही, असा सोईस्कर विचार यामागे आहे. सद्यपरिस्थितीत जिंकण्याची क्षमता हा निकष भाजपला खुणावतो आहे. हे लक्षात घेता रवींसारख्या रेसच्या हुकूमी घोड्यांची भाजपला नितांत गरज आहे.