ठळक बातम्या

अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार

काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना डच्चू दिला जाणार?
नवी दिल्ली – महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली सुरू आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यातील पक्षाच्या मंत्र्यांच्या कामकाजाची यादी मागवली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अधिवेशनानंतर पुढील काही दिवसांत मंत्र्यांच्या कामांची यादी घेऊन दिल्लीला जाणार आहेत. तिथे काँग्रेसच्या हायकमांडसोबत चर्चा करून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. ज्या मंत्र्यांनी समाधानकारक काम केले आहे, त्यांनाच मंत्रिपदी ठेवले जाणार आहे. काँग्रेसच्या जवळपास दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सर्व मंत्र्यांच्या कामांची माहिती राहुल गांधी यांच्यासमोर मांडणार आहेत. त्यानंतर राहुल गांधी कोणत्या मंत्र्याला ठेवायचे आणि कुणाला डच्चू द्यायचा? याबाबतचा निर्णय घेणार आहेत. विशेष म्हणजे ज्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे, त्यांच्या कामावर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचे देखील वृत्त आहे.
काँग्रेससाठी खरेतर सध्या विधानसभा अध्यक्ष कोण होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याशिवाय राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात लक्ष केंद्रित केले आहे. जानेवारी महिन्यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या चार ठिकाणी राहुल गांधींच्या रॅली होणार आहेत. काँग्रेसची एकेकाळी महाराष्ट्रात सत्ता होती. तळागळापर्यंत काँग्रेस पक्ष पोहोचलेला होता. आता पुन्हा काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी राहुल गांधी कामाला लागले आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

गडचिरोलीत पुन्हा वाघिणीची शिकार?

 नखे, शीर काढून वाघिणीला जमिनीत पुरले गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली वनविभागात वाघिणीची शिकार झाल्याचे …